Thursday, November 17, 2011

सु-बापू काळदाते
मराठीत शब्दाच्या आधी सु हा प्रत्यय आला की त्या शब्दाचा अर्थ चांगलाच होतो असे आढळते. बापू काळदाते ह्यांनाही सु ( सुधाताई ) च्या टापटिपीचा प्रत्यय आला तेव्हाच त्यांचे जीवन चांगल्या अर्थाचे झाले असावे. बापूंबरोबर सुधाताईंची आठवण होण्याचे कारण बापू तेव्हा एक सेवादलाचे कार्यकर्ते म्हणून हैद्राबादी आमच्याकडे आले होते. खादीचे कपडे, एक शबनम बॅग व खळखळून बोलणे, हसणे ह्यांनी तेव्हा आमच्या घरावर त्यांचा खूपच प्रभाव पाडला होता. बैठकीत गप्पा चालत तेव्हा कोपर्‍यातल्या टेबलाखाली बसून मी काहीबाही वाचत असे व गप्पांकडे लक्ष ठेवून असे. बापूंची पिशवीही टेबलाजवळच होती. सातवीतल्या मुलाच्या उत्सुकतेला त्यातली एक फाईल बघाविशी वाटली. आणि आदर्श प्रेमपत्रे कशी असावीत त्याचा वस्तुपाठच मला वाचायला मिळाला. बापू व सुधाताईंनी एकमेकाला लिहिलेली प्रेमपत्रे त्यात नीट फाईल केलेली होती. त्यावेळेस सुधाताई सु हे टोपणनाव वापरीत असाव्यात, कारण पत्रांच्या मायन्यात "प्रिय सु" असे असायचे.
पुढे सुधाताईंचे बापूंशी लग्न झाल्यावर त्या पहिल्यांदा औरंगाबादी आल्या तेव्हा त्यांना आणायला रेल्वे-स्टेशनवर मीच एकटा गेलो होतो. आता मी मॅट्रिकला होतो. त्या पहिल्या भेटीतच सुधाताईंचे वेगळेपण अनुभवायला आले. आम्ही रीतसर स्टेशनबाहेर येऊन टांग्यात बसलो ( त्याकाळी घोड्याचे टांगेच होते ), अर्ध्या रस्त्यावर आलो आणि सुधाताईंच्या लक्षात आले की एक होल्डऑल उतरताना काढून घ्यायचाच राहिला. आम्ही परत स्टेशनवर गेलो. सुधाताईंनी डब्याचा नंबर टिपून घेतलेला होता. तोंवर डब्यांना नंबर असतात हेही मला माहीत नव्हते. स्टेशनमास्तरला सांगून त्यांनी पुढच्या स्टेशनवर तो होल्डऑल काढून घेऊन तो परत पाठवण्याची व्यवस्था करून घेतली आणि संध्याकाळपर्यंत तो होल्डऑल औरंगाबादी पोचलाही. त्याकाळी रेल्वेकडून असले अचाट कर्त्तत्व करवून घेणा‍र्‍या त्या एक धाडशी महिला होत्या.
बापू जरी राजकारणातल्या रुक्ष व्यवहारात गुंतलेले असायचे तरी त्यांनी रसिकता चांगलीच जपलेली होती. आणि ते त्यांच्या सेवादलात असण्यापासून दिसत होते. वसमतला वीस दिवसांचा सेवादलाचा कॅंप होता. त्याला मी होतो. आता कॅंपचे सगळे कार्यक्रम बापूंनी रीतसर घेतले व त्यात कमाल म्हणजे त्यांनी आम्हा मुलांना तिथून नांदेडला नेले, आठवडाभरासाठी. तिथे नरहर कुरुंदकर आम्हाला जीवनराव बोधनकरांच्या घरी, रोज दोन तीन तास, मर्ढेकरांच्या कविता समजावून सांगत. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना त्या काळात एका सेवादलाच्या कार्यकर्त्याने नरहर कुरुंदकरांसारख्या व्यासंगी साहित्यिकाकडून, मर्ढेकरांच्या कवितांची ओळख करून द्यावी, ह्यात त्यांच्या रसिकतेची प्रगल्भ जाणच दिसून येते आणि इथे परत हे वा.गो.मायदेव ह्या प्रसिद्ध कवीची मुलगी असलेल्या सुधाताईंचे त्यांना प्रत्यय असल्याने झाले असावे, हेही उघड होते.
राजकारणात नुकत्याच पदार्पण करतानाचे बापूंचे उमेदीचे दिवस ( एका विद्यार्थ्याच्या नजरेने ) मी अगदी जवळून पाहिले आहेत. जेव्हा पब्लिक-स्पीकींग म्हणजे काय असते हे कोणालाही माहीत नव्हते, तेव्हा बापू एखाद्या भाषणाची तयारी आरशासमोर उभे राहून तासन्‌ तास करताना मी पाहिलेले आहे. एखादे कसब कमवायचे तर त्याचा शास्त्रोक्त अभ्यास व सराव करावा हा दृष्टिकोनच मोठा उमदा आहे. असेच समाजवाद कसा असावा, हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाह्यला मिळालेले ते एक अपवादात्मक समाजवादी आहेत. कारण त्या काळात ते इस्त्राईलला जाऊन त्यांच्या पंतप्रधानाला, बेन गुरियान, ला भेटून आले होते. त्यांनी सांगितलेली एक समाजवादाची प्रचीती मला अजून लक्षात आहे. बापूंची भेट झाल्यावर बेन गुरियान बापूंना कारने पोचवायला आले होते व नंतर स्वत: बसच्या लाइनीत उभे राहिले होते. आजकालच्या बरबटलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर तर वाटते, समाजवाद असावा तर असा !
त्या काळात समाज कार्याला झोकून दिलेले हे मोठे मोहक दांपत्य होते. बापू दौर्‍यात व्यस्त असत, तर सुधाताई खेड्यापाड्यांनी सोशल वर्करचे काम करीत असत. त्या दरम्यान त्यांच्या पहिल्या मुलीचे, कांचनचे, संगोपन करण्यात मला खारीचा वाटा उचलायला मिळाला ह्याचे मला खूप अप्रूप आहे. ज्यांनी एका ध्येयापायी आपला संसार पणाला लावला, त्यांना देवाने सोन्यासारख्या मुली द्याव्यात, हा दैवी न्यायच म्हणायला हवा ! असेच त्याने सुधाताईंना बळ व बापूंच्या आत्म्याला शांती द्यावी !

----------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

-----------------------------------------------------------------

Monday, November 14, 2011

अभिमान बाळगावा असे डॉ.अहंकारी
६ नोव्हेंबर २०११ ला औरंगाबादी "अनंत भालेराव-स्मृती-पुरस्कार" डॉ.शशिकांत अहंकारी ह्यांना देण्यात आला. डॉ.अहंकारी व त्यांच्या गायनॅकॉलॉजिस्ट पत्नी डॉ.शुभांगी अहंकारी हे दांपत्य, एका खेड्यात ( अणदूर, तुळजापूर तालुक्यात, उस्मानाबाद जिल्ह्यात, सोलापूर पासून ४० किमी वर हे खेडे आहे) एक अतिशय मोलाचे काम करीत आहेत. त्याचा हा सन्मान आहे. हा २३वा वार्षिक स्मृती-पुरस्कार ह्या आधी निरनिराळ्या क्षेत्रातल्या प्रथितयशांना मिळालेला आहे, जसे: कुमार केतकर, वसंत पळशीकर, अप्पा जळगावकर, गोविंद तळवलकर, ना.धों.महानोर, मंगेश पाडगावकर, वगैरे.
अणदूर ह्या खेड्यात अहंकारींनी हॅलो ( हेल्थ ऍंड ऍटो लर्निंग ओर्गनाइझेशन ) नावाची संस्था काढली आहे. डॉ.अहंकारी औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजात विद्यार्थी असतानाच युक्रांद वगैरे सारख्या चळवळीतल्या मित्रांना घेऊन सुट्ट्यात स्वयंसेवी आरोग्य सेवा आसपासच्या खेड्यात पुरवत असत. पुढे डॉक्टर झाल्यावर ह्या कामाची पूर्णवेळी सुरुवात त्यांच्या आईच्या नावे काढलेल्या "जानकी रुग्णालया"ने झाली व सध्या त्यांचा "भारत-वैद्य" नावाचा प्रकल्प सरकारनेही वाखाणला आहे. गावोगावच्या खेड्यापाड्यातून थोड्याशा ( इयत्ता ८ ते १२) शिकलेल्या स्त्रियांना ते ५० दिवसांच्या प्रशिक्षणात प्राथमिक आरोग्याचे व विशेषत: माता-बाल-संगोपनाचे प्रशिक्षण देतात. ह्यांना ते "भारत-वैद्य" म्हणतात. अशा ७५ भारत-वैद्य स्त्रिया ७० खेड्यापाड्यातून अवघ्या पाच रुपये/दर रुग्णामागे, एव्हढ्या अल्प खर्चात, हे आश्चर्यकारक काम करतात. ह्याबाबतीत त्यांचा एक नाराच आहे: "एसटीच्या खर्चात, उपचार गावात".मग ह्या भारत-वैद्य स्त्रिया त्यांच्या गावात घरोघरी जाऊन प्राथमिक आरोग्य-सेवा देतात. हे काहीसे चीनच्या बेअर-फुट डॉक्टर्स सारखेच आहे. ह्या मूलभूत प्रशिक्षणाला हलके लेखू नका. कारण ह्या मूलभूत ज्ञानामुळे लबाड डॉक्टरांची ह्या खेडवळ स्त्रिया कशी बोबडी वळवतात त्याचा एक किस्सा ऐका. एका मुलाच्या पोटात खूपच दुखत असते. प्राथमिक उपचाराने बरे वाटत नाही. मग शेजारीपाजार्‍यांच्या मदतीने ती भारत-वैद्य त्याला शहराच्या ठिकाणी घेऊन जाते. शहरातला डॉक्टर म्हणू लागतो ह्याच्या पोटात डावीकडे जे दुखते आहे ते ऍपेंडिक्स मुळे व ते फुटायच्या आत त्याचे ऑपरेशन करणे जरूरीचे आहे व त्याला साधारण दहा हजार खर्च येईल. भारत-वैद्य म्हणते की आम्हाला शिकवले आहे की ऍपेंडिक्स तर उजवीकडे असते तर मग हे दुखणे ऍपेंडिक्सचे कसे असेल ? त्या पोराचे दुखणे मग दुसर्‍या डॉक्टराकडून मिटवल्या जाते व लबाड डॉक्टरांची लबाडी एका प्राथमिक आरोग्याच्या शिक्षणाने उघडकीला येते.
स्त्रियांविषयीच्या अपार कणवेपायी डॉक्टर अहंकारी दांपत्याने अडाणी स्त्रीलाही समजेल अशा चाचण्या अमलात आणून रूढ केल्या आहेत. जसे एकदा एका मुलीने एका भारत-वैद्याला विचारले होते की "एचबी" म्हणजे काय ? त्यावर मग डॉक्टरांनी हेमोग्लोबीनचे गरोदरपणातले महत्व समजावून सांगितले व भारत-वैद्यांना शिकविले की फक्त बाळंतिणीची नखे बघा. ती फिकी असतील तर हेमोग्लोबिन कमी आहे, लोहगोळ्या द्या, लालसर असतील तर ठीक आहे. शोधाची जननी गरज असते, हेच इथे पहायला मिळते. असेच त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान ते जे अभिनव प्रयोग योजतात त्याला दाद द्यावी. उदाहरणार्थ स्त्रीची शरीर-रचना समजावताना ते फरशीवर बाईची आकृती खडूने काढतात व मग त्यात यकृत, किडनी, योनी वगैरे अवयव रंगीत खडूने भरतात. हा ग्रामीण ऍनॉटॉमीचा वर्ग मोठा मनोहारी वाटतो व प्रभावीही.
डॉ. अहंकारींनी अतिशय कल्पकतेने "माता-दत्तक-योजना" तिथे राबवली आहे. वस्तीतल्यांच्या मदतीने तिथली भारत-वैद्य स्त्री गरोदर मातेला दत्तक घेते. तिने १२ आठवड्याच्या आत दवाखान्यात नाव नोंदवले का नाही, धनुर्वाताची तीन इंजेक्शने घेतली की नाही, शंभर लोहगोळ्या घेतल्या की नाही व योग्य आहार वेळच्या वेळी घेतला की नाही ही अगदी प्राथमिक आरोग्याची काळजी वाहते. ह्या जुजबी काळजीमुळे माता-बालक-मृत्यूचे प्रमाण घटते, व आयुष्याची सुरुवात नेमकी व विश्वासक होते. ह्यामुळेच सोलापूरच्या गरीब वस्त्यात ते ह्या चळवळीचे नाव "शुअर स्टार्ट" असे ठेवतात जे अतिशय चपखल असेच आहे.
सोलापूर हे अणदूरजवळ असलेले मोठे शहर. अहंकारींनी इथल्या झोपडपट्टीसारख्या गरीब वस्तीत मोठा यशस्वी उपक्रम राबवला आहे. ८० वस्त्यातील २ लाख स्त्रियांना बचतगटाच्या माध्यमातून आरोग्यसेवा पुरवल्या आहेत. बचतगटामार्फत स्त्रियांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिल्या जाते. गाई, म्हशी, दळण-कांडणाची लहान यंत्रे, दुकानांसाठी मदत वगैरे. ह्यासंबंधी अहंकारींचा अनुभव अगदी ह्रद्य आहे. एका बाईने बचत गटाकडून एक गाय घेतलेली असते. त्यासाठी तिने बचत-गटाला अवघे ६० रुपये भरलेले असतात. पण तिच्या नवर्‍याला तिने त्याची परवानगी न घेता हा कारभार केला हे आवडत नाही. तो तिला बेदम मारतो व घरातून काढून टाकतो. ह्यावर ती बाई, डोळे पुसते व गाय घेऊन जाऊ लागते. नवरा म्हणतो, गाय कशाला नेतेस ? त्यावर ती म्हणते बचत गटाने दिलीय, त्यांची त्यांना परत करते व जाते. ह्या अनुभवातून आत्मसन्मानासाठी स्त्रिया कशा तयार होत आहेत त्याचेही समाजाला भान यावे.
स्त्री-भ्रूण-हत्या विरोधात काम करीत असताना डॉ. अहंकारी एक विदारक प्रसंग सांगतात, ज्यामुळे कोणाही पुरुषाला लाज वाटावी. त्यांची एक कार्यकर्ती असते. ती सरपंच म्हणून निवडून येते. नवर्‍याचा प्रथम पाठिंबा असतो. पण नंतर तिच्या कामामुळे तिचे जागोजागी सत्कार व्हायला लागतात. ते सहन न होऊन मग तो तिला मारहाण करायला लागतो. बाईला एके वेळी भर सभेत तिच्या पाठीवरचे वळ दाखवावे लागतात. ह्या पुरुषी अहंकारामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना आजही प्रचंड त्रास होतो. कदाचित ह्या पुरुषी अहंकाराची सतत जाणीव रहावी म्हणूनच स्वत: अगदी निर-अहंकारी आणि कोणीही अभिमान बाळगावा असे ते असूनही डॉक्टरांनी अहंकारी हे आडनाव अजूनही जपले असावे.
असेच ग्रामीण भागात जी माणूसकी गरीबीमुळे जपली जाते त्यावर शहरी मध्यमवर्गीयांनी विचार करावा अशी घटना अहंकारींच्या कामात घडलेली आहे. ती अशी: एका बाईला तिच्या वस्तीत, कचर्‍यात एक नवजात मूल टाकून दिलेले सापडते. सगळ्या आजुबाजूच्या बायका, भारत-वैद्य, एकत्र येऊन ठरवतात की ह्या मुलीला सगळी वसतीच दत्तक घेईल व ह्या वसतीतच वाढवील. ज्याने टाकून दिलेय त्याच्या देखत. मग सगळ्याजणी मिळून पोलिसात जाऊन, रीतसर कारवाई करून, ती मुलगी वाढवितात, तिचा दरवर्षी वाढदिवस साजरा करतात. शहरातल्या संवेदनाशून्य झालेल्या वागण्यावर हे झणझणीत अंजनच जणू. ग्रामीण कळवळीचा पाठ शहरी जनतेने गिरवावा असेच हे कर्तृत्व आहे !
बाबा आमटे, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव ह्यांच्या पाठबळाने डॉक्टर अहंकारी ह्यांचा समाजकार्याचा आवाका खूपच मोठा झालेला आहे. त्यांचे व्हिजन-वाक्यच मुळी आहे: निरोगी, स्वावलंबी व न्यायी समाज. आणि ह्यासाठी संस्थेचे व्रत ( मिशन ) त्यांनी ठेवले आहे: दुर्लक्षित घटकांचे संघटन, संस्था व शासन ह्यांच्यात समन्वय, व वैज्ञानिक दृष्टिकोनातून निरोगी व स्वावलंबी समाज निर्माण करणे. ह्या आवाक्यामुळे त्यांच्या उपक्रमात अंतर्भूत आहेत : सावली केंद्र ( स्त्रियांवरील हिंसाचार रोखण्यासाठी हस्तक्षेप ); किशोरी प्रशिक्षण ( शिवण क्लास, छंदवर्ग, वाचनालय, सायकल चालविणे, वगैरे ); कलापथक ( लोककलेतून आरोग्य संवाद साधण्यासाठी ह्यात बालविवाह, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या, विरोधी जनजागरण केले जाते ); ग्रामीण विज्ञान केंद्र ( ३० विद्यालयातील ८०० विद्यार्थी विज्ञान-प्रयोग शाळेचा लाभ घेतात. विज्ञान वाहिनी पुणे, व दुर्गादेवी ट्रस्ट पुणे त्यांना मदत करतात ); शाश्वत शेती ( सेंद्रीय शेतीचा प्रचार व प्रयोग ह्यासाठी १० गुंठे शेतीत महिलांना शेतीव्यवसायातल्या प्रयोगांची ओळख करून देण्यात येते);
डॉ. अहंकारींच्या अनेक प्रकल्पांना नामवंत संस्थांचे पाठबळ मिळते आहे. त्यात ऑक्सफॅम, फोर्ड फौंडेशन, युनिसेफ, स्विस-एड, सिद्धिविनायक ट्रस्ट, महाराष्ट्र फौंडेशन, व पाथ ह्या सेवाभावी संस्था त्यांच्या प्रकल्पांचा मरातब वाढवतात. "भारतवैद्यक डायरी आरोग्याच्या विकासाची" हे पुस्तक ग्रंथाली वाचक चळवळीने प्रकाशित केले आहे. तसेच युनिक फीचर्स तर्फे "खरेखुरे आयडॉल्स"मध्येही अहंकारी ह्यांचा अंतर्भाव आहे. "वेगळ्या वाटांचे प्रवासी" ह्या साकेत प्रकाशनातही त्यांची माहीती आहे. पाहता पाहता ह्या कार्याला आता १५ वर्षे होत आली आहेत. जिथे शहरातून अहंकारींचा सत्कार होतो वा सभा होतात त्याला ते त्यांच्या खेड्यातल्या १५/२० स्त्री -कार्यकर्त्यांना आवर्जून बरोबर घेऊन जातात, ज्यामुळे शहरातल्यांची व खेड्यातल्यांची जनजागृती होते. अहंकारींचा मुलगा सध्या इंग्लंडात एका संशोधनवृत्तीवर काम करतोय, त्यावरून हा वसा पुढच्या पिढीतही जपला जात आहे त्याची धन्यता वाटते. जगन्नाथाच्या रथाला जसे जितकी माणसे ओढतील तितके ते दैवत सहजी विराजते, तसेच मानून सर्व सेवाभावी लोकांनी ह्या संस्थेला अवश्य मदत करावी. त्यांचा पत्ता आहे : हॅलो मेडिकल फौंडेशन, जानकी रुग्णालय, अणदूर, ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद--पिन कोड: ४१३६०३ ( महाराष्ट्र ) व ई-मेल : shashikant.hmf@gmail.com आणि संकेत-स्थळ आहे: www.halomedicalfoundation.org

-------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

-------------------------------------------------------

Saturday, November 12, 2011

अभिमान बाळगावा असे डॉ.अहंकारी
६ नोव्हेंबर २०११ ला औरंगाबादी "अनंत भालेराव-स्मृती-पुरस्कार" डॉ.शशिकांत अहंकारी ह्यांना देण्यात आला. डॉ.अहंकारी व त्यांच्या गायनॅकॉलॉजिस्ट पत्नी डॉ.शुभांगी अहंकारी हे दांपत्य, एका खेड्यात ( अणदूर, तुळजापूर तालुक्यात, उस्मानाबाद जिल्ह्यात, सोलापूर पासून ४० किमी वर हे खेडे आहे) एक अतिशय मोलाचे काम करीत आहेत त्याचा हा सन्मान आहे.
अणदूर ह्या खेड्यात अहंकारींनी हॅलो ( हेल्थ ऍंड ऍटो लर्निंग ओर्गनाइझेशन ) नावाची संस्था काढली आहे. सुरुवात त्यांच्या आईच्या नावे काढलेल्या "जानकी रुग्णालया"ने झाली व सध्या त्यांचा "भारत-वैद्य" नावाचा प्रकल्प सरकारनेही वाखाणला आहे. गावोगावच्या खेड्यापाड्यातून थोड्याशा ( इयत्ता ८ ते १२) शिकलेल्या स्त्रियांना ते एक महिन्याच्या प्रशिक्षणात प्राथमिक आरोग्याचे व विशेषत: माता-बाल-संगोपनाचे प्रशिक्षण देतात. ह्यांना ते "भारत-वैद्य" म्हणतात. मग ह्या भारत-वैद्य स्त्रिया त्यांच्या गावात घरोघरी जाऊन प्राथमिक आरोग्य-सेवा देतात. हे काहीसे चीनच्या बेअर-फुट डॉक्टर्स सारखेच आहे. ह्या मूलभूत प्रशिक्षणाला हलके लेखू नका. कारण ह्या मूलभूत ज्ञानामुळे लबाड डॉक्टरांची ह्या खेडवळ स्त्रिया कशी बोबडी वळवतात त्याचा एक किस्सा ऐका. एका मुलाच्या पोटात खूपच दुखत असते. प्राथमिक उपचाराने बरे वाटत नाही. मग शेजारीपाजार्‍यांच्या मदतीने ती भारत-वैद्य त्याला शहराच्या ठिकाणी घेऊन जाते. शहरातला डॉक्टर म्हणू लागतो ह्याच्या पोटात डावीकडे जे दुखते आहे ते ऍपेंडिक्स मुळे व ते फुटायच्या आत त्याचे ऑपरेशन करणे जरूरीचे आहे व त्याला साधारण दहा हजार खर्च येईल. भारत-वैद्य म्हणते की आम्हाला शिकवले आहे की ऍपेंडिक्स तर उजवीकडे असते तर मग हे दुखणे ऍपेंडिक्सचे कसे असेल ? त्या पोराचे दुखणे मग दुसर्‍या डॉक्टराकडून मिटवल्या जाते व लबाड डॉक्टरांची लबाडी एका प्राथमिक आरोग्याच्या शिक्षणाने उघडकीला येते.
डॉ. अहंकारींनी अतिशय कल्पकतेने "माता-दत्तक-योजना" तिथे राबवली आहे. वस्तीतल्यांच्या मदतीने तिथली भारत-वैद्य स्त्री गरोदर मातेला दत्तक घेते. तिने १२ आठवड्याच्या आत दवाखान्यात नाव नोंदवले का नाही, धनुर्वाताची तीन इंजेक्शने घेतली की नाही, शंभर लोहगोळ्या घेतल्या की नाही व योग्य आहार वेळच्या वेळी घेतला की नाही ही अगदी प्राथमिक आरोग्याची काळजी वाहते. ह्या जुजबी काळजीमुळे माता-बालक-मृत्यूचे प्रमाण घटते, व आयुष्याची सुरुवात नेमकी व विश्वासक होते. ह्यामुळेच सोलापूरच्या गरीब वस्त्यात ते ह्या चळवळीचे नाव "शुअर स्टार्ट" असे ठेवतात जे अतिशय चपखल असेच आहे.
स्त्री-भ्रूण-हत्या विरोधात काम करीत असताना डॉ. अहंकारी एक विदारक प्रसंग सांगतात, ज्यामुळे कोणाही पुरुषाला लाज वाटावी. त्यांची एक कार्यकर्ती असते. ती सरपंच म्हणून निवडून येते. नवर्‍याचा प्रथम पाठिंबा असतो. पण नंतर तिच्या कामामुळे तिचे जागोजागी सत्कार व्हायला लागतात. ते सहन न होऊन मग तो तिला मारहाण करायला लागतो. बाईला एके वेळी भर सभेत तिच्या पाठीवरचे वळ दाखवावे लागतात. ह्या पुरुषी अहंकारामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना आजही प्रचंड त्रास होतो. कदाचित ह्या पुरुषी अहंकाराची सतत जाणीव रहावी म्हणूनच स्वत: अगदी निर-अहंकारी आणि कोणीही अभिमान बाळगावा असे ते असूनही डॉक्टरांनी अहंकारी हे आडनाव अजूनही जपले असावे.
डॉ. अहंकारींच्या अनेक प्रकल्पांना नामवंत संस्थांचे पाठबळ मिळते आहे. त्यात ऑक्सफॅम, फोर्ड फौंडेशन, युनिसेफ, स्विस-एड, सिद्धिविनायक ट्रस्ट, महाराष्ट्र फौंडेशन, व पाथ ह्या सेवाभावी संस्था त्यांच्या प्रकल्पांचा मरातब वाढवतात. जगन्नाथाच्या रथाला जसे जितकी माणसे ओढतील तितके ते दैवत सहजी विराजेल, तसेच मानून लोकांनी ह्या संस्थेला अवश्य मदत करावी. त्यांचा पत्ता आहे : हॅलो मेडिकल फौंडेशन, जानकी रुग्णालय, अणदूर, ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद--पिन कोड: ४१३६०३ ( महाराष्ट्र ) व ई-मेल : shashikant.hmf@gmail.com आणि संकेत-स्थळ आहे: www.halomedicalfoundation.org

-------------------------------------------
अरुण अनंत भालेराव