Saturday, April 24, 2010

द भालेराव : ५
गोड साक्षात्कार !
मला नुकतीच शुगर निघाली आणि एक गोड साक्षात्कारच झाला !
प्रत्येक माणसात देवाचा अंश असतोच, असे म्हणतात, तसा प्रत्येक माणसात शुगर असतेच हे मात्र आता मला स्वानुभावाने कळले.
बाहेरून साखरेच्या असण्याचे काही प्रमाण दिसत नाही, पण तपासले तर प्रत्येकात देव आढळतोच तशी थोडी वा फार साखर निघतेच निघते.
एकदा का हा दैवी साक्षात्कार झाला की मग गोडी कमी झाली तर चालत नाही. म्हणजे शुगर कमी झाली की चक्कर येते तसेच देवाची गोडी कमी झाली की नाही नाही त्या फेर्‍यात (चक्करेत) माणूस पडतो.
शुगर निघाली रे निघाली की फिरणे अगदी अत्यावश्यक होते. कारण देतात, अतिरिक्त गोडी जाळण्याचे. देवाचा साक्षात्कार झाला की असेच होते. बसून न राहता सगळीकडे मिरवावे लागते.
शुगर निघाली की आपण जे एरव्ही बका बका खातो ते थांबते. कशात किती साखर आहे हे पाहणे अगदी चौकस होते. प्रत्येक पदार्थात आपण काय चांगले काय वाईट ते बघू लागतो. देवाचा साक्षात्कार झाला की सगळीकडे पाहण्य़ाची नजर अशीच विवेकाची ठेवावी लागते. कोण चांगला आहे, सत्संग कोणता, हे पाहत जगावे लागते.
जेवणानंतरची शुगर ज्यास्त असते तर सकाळी फास्टींगची कमी असते. म्हणजे साखर कमी असावी तर उपास घडला पाहिजे. ह्याच नियमावरून देवासाठी उपास तापास करण्याची परंपरा तयार झाली असावी.
देवाचा अंश आपल्यात आला की आपण कसे देवमय होऊन जातो, देवात विलीन होतो तसाच काहीसा संकेत शुगर येण्याचा असतो. म्हणजे आता शुगर आलीय तर पर्याणाचा अंतिम दिवस, गोड शेवट, फार लांब नाही हाच तो संकेत !

--अरूण भालेराव
भ्रमण :९३२४६८२७९२

Tuesday, April 13, 2010

:द भालेराव : ४

आयेशा, लई भारी !
सर्व सौंदर्यशास्त्राचा पचका करीत, सुंदर सानियाचा पार चुराडा केलाय आयेशा आपाने ! शोएबला तर तिने चिमटूनच टाकले आहे. आता म्हणे आयेशाचा भाव खूपच वधारला आहे. साहजिकच आहे. तिचे वजन असेल, १५० किलो. आणि तिला देऊ केलेत १५ कोटी रुपये, म्हणजे, गेला बाजार, भाव पडतो, दहा लाख रुपये किलो ! सर्व साधारण बाई-माणसांसारखे तिने डाएटिंग वगैरे केले नाही ते बरेच झाले म्हणायचे. अजून एक बरे झाले की आयेशा किंवा शोएब बंगाली नाही झाले. नाही तर बंगाली वराला लग्नात बधूला उचलावे लागते ते अशक्यच झाले असते !
खरी लग्नामागची बातमी शरद पवारांनी गुलदस्त्यात ठेवली होती. अजूनही ती तशी बाहेर आलेली नाहीय.
पण तुम्ही आपल्यातलेच म्हणून सांगायला हरकत नाही की शोनिया ह्यांनी एक क्रिकेट टीम आयपीएल मध्ये विकत घेतली आहे. ह्यांचे स्टेडीयम दुबईला राहणार असून ते क्रिकेटचा खेळ टेनिसच्या नियमांनुसार खेळणार आहेत. ते असे :
१) फर्स्ट सर्व जशी नेटला घसटून गेली तर परत री-सर्व करतात, तसे पहिला बॉल स्टंप्स्ना घसटून गेला तर तो परत टाकावा लागेल.
२)असे दोनदा घडले तर तो बोलरचा "डबल फॉल्ट" धरण्यात येईल.
३) समजा पहिला पॉइंट तुमचा गेला ( म्हणजे पहिल्या बॉलवर रन नाही मिळाला ) व प्रतिपक्षालाही असेच झाले तर "लव्ह ऑल" असे घोषित करण्यात येईल व कोर्टवर हजर असलेल्या पैकी सगळ्यात वजनदार व्यक्तीला प्राईझ-मनी द्यावा लागेल.
४) लग्नाआधी शोएबला जसा डायव्होर्स घ्यावा लागला तसा प्रत्येक खेळाडूला टीमपासून डायव्होर्स घ्यावा लागेल.
५) मॅच ठरलेल्या तारखेच्या आधीच होईल.
६) मॅच झाल्यावर प्रत्येक खेळाडूला आपला देश सोडून दुसर्‍या देशात स्थलांतर करावे लागेल.
७) मॅच दरम्य़ान फक्त बिर्याणी देण्यात येईल.

अरूण अनंत भालेराव
भ्रमण : ९३२४६८२७९२