Friday, March 5, 2010

मौखिक परंपरेचे मुख !
तुकाराम महाराजांच्या काळी जो वारकरी संप्रदाय होता,त्याची म्हणतात मौखिक परंपरा होती. म्हणजे जे काही संप्रदायाचे ज्ञान, नियम, रीती-रिवाज होते,ते कुठे लिखित स्वरूपात नव्हते तर सर्व तोंडी होते. जसे भजन, कीर्तन वगैरे सर्व मुखाने म्हणण्याचे प्रकार होते. अशी ही मौखिक परंपरा.
त्याच वेळी दुसरा एक महानुभावी संप्रदाय होता. तो वारकर्‍यांपेक्षा प्रगत होता.पण त्यांचे साहित्य,नियम,रूढी वगैरे सर्व मोडी लिपीत लिखित स्वरूपात होते.ह्या कठिण प्रकारापायी हा संप्रदाय लवकर लयाला गेला. मौखिक परंपरेमुळे वारकरी संप्रदाय बराच टिकला, वाढला.
आपल्याला वाटते, आज जग किती पुढे गेले आहे,सगळे कसे नीट,संगतवार लिहून ठेवलेले असते. मोठमोठे करार व्यवस्थित कलमे घालून लिहून ठेवलेल्या बाडातून असतात. सगळ्यात मोठ्ठा करार कोणता ? " आय डू " किंवा "शुभ लग्न सावधान" म्हणून होणारे लग्न ! का हा मोठ्ठा करार ? कारण ह्या करारान्वये संतती निर्माण करीत लोक एक नवीन पीढी तयार करतात. ह्यापेक्षा मोठी निर्मिती ती काय ? आणि कसा असतो हा करार ? तोंडी ! आणि त्याला कायद्याच्या सर्व बाबी लागू होतात. चालू आहे ना मौखिक परंपरा !
वीस पंचवीस वर्षापूर्वी शेअर बाजार,सट्टे बाजार हे सर्व तोंडी चालत. खूप दाटी होई. दलालांना लटकण्यासाठी बस मध्ये असतात तसे चामड्याचे पट्टे असत. मोठ्ठ्याने ओरडत, खाणाखुणा करीत हे सर्व चाले.मोठ मोठे लिलाव कसे होतात ? ( आयपीएल चा लिलाव आठवा ) बोली तोंडी लावावी लागते. लिलाव करणारा म्हणतो, दस लाख एक बार, दस लाख दो बार, दस लाख तीन बार, सोल्ड ! खल्लास इकडचा बंगला तिकडे ! निवडणुकींचे,क्रिकेटचे,सट्टे फोन वरून, तोंडीच असतात.
प्रत्येक माणूस भाषा शिकतो तो आईच्या तोंडून आपल्या तोंडी, मौखिक परंपरेने. गाणी तर बोलून चालून सगळा तोंडी मामला. हुशार मुलाला शिकवाल ते तोंडपाठ असते.पूर्वी परीक्षाही तोंडी असत. अजूनही डॉक्टरीची अवघड परीक्षा तोंडीच असते. पीएचडीचे डिफेन्स नावाचे भाषण व प्रश्नोत्तरे तोंडीच असतात. ग्रेट ग्रेट गुरू, लेक्चर्स देतात तोंडी. निवडणुका जिंकल्या जातात तोंडी भाषणांनी. देश चालवल्या जातो, लोकसभेत, तोंडी. माणसाचे सर्व महत्वाचे व्यवहार, जसे, शिक्षण, प्रेम, संसार, गुजगोष्टी, आरडाओरडा, त्रागा, आवाहने, आव्हाने,ऑफिसातल्या मीटींग्ज, रस्त्यावरची गजबज, मुलांचे संगोपन, नातेवाईकांशी संवाद, वगैरे ,तोंडीच होतात. म्हणजे मौखिक परंपरा आपण अजून पाळतोय तर !
आयटी ( संगणक ) युगामुळे सगळे संगणकाच्या भाषेत सांगितले तरच लवकर कळते. मौखिक परंपरा किती महत्वाची माहीती आहे ? अहो संगणकात सगळ्यात मोठी फाईल साऊंड बाइट्सचीच होते. म्हणजे मौखिक परंपराच ग्रेट !
---अरुण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२

Thursday, March 4, 2010

काँग्रेसची पोरं लई हुशार !
हुशारी ही एखाद्या संस्थेकडे असतेच की हुशार माणसे त्या संस्थेत आल्याने त्या संस्था हुशार होतात हा संशोधनाचा विषय असावा. पण इतक्या वर्षांपासून काँग्रेस पक्ष सत्ता कब्जात ठेवून आहे की सत्तेला काय लागते व काय चालते हे ते चांगले जाणतात. कसे ते पहा.
शरद पवारांवर अगदी पोरासोरांनी ह्या एक दोन महिन्यात तोंडसुख घेतले. मागे पवार म्हणत की पाऊस पडला नाही तरी त्याला शरद पवारांना दोषी धरायचे , ह्या नीतीला धरून महागाईला तेच आणि तेच कसे जबाबदार आहेत ह्याचा सगळ्यांनी गळा काढला. काहींना वाटले आता साहेबांचे दिवस भरले, आता काही ते रहात नाहीत. साहेबांनीही निर्यातीचा निर्णय कसा माझा नव्हता, तुमचा होता, व त्याने साखर महागली वगैरे भाषा सुरू केली आणि काँग्रेसला भान आले. त्यांना साक्षात्कार झाला की आपल्याला कोणाचा दोष काढण्यापेक्षा सत्तेला सुरुंग लागणार नाही हे पाहणे महत्वाचे आहे.
मग त्यांनी काय केले, बजेट मध्ये पे‍ट्रोल व डीझेलचा भाव वाढवला. ह्याने झाले काय की महागाई खरेच वाढली तर ती इंधन-भाववाढी मुळे वाढली असे झाले. पवारांचे कारण आता झाकले गेले. इंधन भाववाढ काय एकदोन वेळा करावीच लागते आणि ती सगळ्यांच्याच परिचयाची आहे. एक प्रकारे तिला जनतेची माफीच आहे. आणि आता बजेटच्या वेळी नड कशाची आहे तर जीडीपी ची घोडदौड दाखवायची. शिवाय जीडीपी चा काय आकडा काढायचा ते तर तद्दन आपल्या अखत्यारीतील बाब आहे. हा आकडा कसा काढतात, तो कसा लाख कोटीत आहे, हे कोणा लेकाला कळते ? कळलेच नाही तर त्याविरुद्ध बोलणार तरी कोण ? तर सत्ता अशी अबाधित !
पवारांना असं कव्हर केल्यावर ते कशाला काय बोलतील ?
काँग्रेसची पोरं अशी हुशार !

---अरूण अनंत भालेराव

Wednesday, March 3, 2010

ईतुका सकल संपूर्ण !
तुकाराम महाराज जर संगणकावर अवतरले तर आपल्याला त्यांना ई-तुका म्हणावे लागेल. पण फरक इतुकाच राहणार नाही तर बरेच नवे काही संगणक आपल्याला सांगेल.
संगणकाचे युग हे वेगाचे युग असते. संगणकावर लिहिण्याचा वेग, तो अपलोड होण्याचा वेग, तुकारामाचे अभंग डाऊनलोड करण्याचा वेग, असे सगळे वेगवान जग, प्रथम मोजते तो वेगच ! तुकाराम महाराजांना सगळ्यात अप्रूप कशाचे होते तर ते शब्दांचे. म्हणूनच ते म्हणाले होते : "आम्हा घरी धन, शब्दाची च रत्ने । शब्दाचीच शस्त्रे, यत्न करू ॥ शब्द चि आमुच्या, जीवाचे जीवन । शब्दे वाटू धन, जनलोका ॥ तुका म्हणे पाहा, शब्द चि हा देव । शब्दे चि गौरव, पूजा करू ॥" तुकाराम महारांच्या गाथेचे देहू प्रत, जोग प्रत, शासकीय प्रत वगैरे अनेक प्रती आहेत. पैकी देहू प्रत संगणकावर उपलब्ध असून ती तुकाराम.कॉम ह्या वेबसाईटवर ही पाहता येते. तुकाराम महाराजांच्या ह्या गाथेत एकूण ४५८३ अभंग आहेत. आता इतक्या प्रचंड गाथेत एकूण शब्द किती असतील बरे ? प्रत्यक्ष पुस्तकात (हार्ड कॉपी) एकेका पानावर शब्द मोजायचे म्हणजे फार जिकीरीचे काम. शिवाय संगणक युगात असं मोजत बसलं तर हसं होईल ते होईलच. संगणकाकडूनच एकूण शब्द मोजता आले तर मात्र ते आधुनिक वाटेल. तर ही प्रत वर्ड हया प्रकारात उघडून त्यातल्या वर्ड-काऊंट सवलतीचा उपयोग केला तर? करून पाहिले तर एकूण शब्द गाथेत निघाले : दोन लाख,तीन हजार आणि सातशे पन्नास ( २,०३,७५० शब्द ). संगणकावर फार विश्वास टाकता येत नाही. कधी कधी आपल्या चुकीने चुकीचे उत्तरही येऊ शकते. म्हणतातच की संगणक म्हणजे गार्बेज इन गार्बेज आऊट ( कचरा आत तर कचरा बाहेर ! ). मग ह्याचा प्रत्यक्ष प्रतीतल्या (हार्ड कॉपी) एका पानावरचे शब्द मोजले तर ते निघाले :२१५ व अशी पाने भरली ९५५. म्हणजे अंदाजे शब्द २,०५,३२५. हे संगणकाच्या वर्ड-काऊंटच्या २,०३,७५० शब्दांच्या बरेच जवळचे आहे म्हणून बरोबर असणार. आता तुकाराम महाराजांनी हे सर्व शब्द वयाच्या ४२ व्या वर्षापर्यंत लिहिलेले आहेत. साधारण विसाव्या वर्षी त्यांचे कवित्व सुरू झाले असेल असा अंदाज धरला तर २२ वर्षांचा सर्जनशील कालखंड मिळतो. भागाकार केल्यावर हे भरतात दिवसाकाठी २५ शब्द !
दिवसाकाठी २५ शब्द हा वेग प्रचंड का खूप कमी हे आता पाहू या. मागच्या वर्षी महाराष्ट्र-काव्य भूषण हा किताब मिळालेले बहु-प्रसव कवी मंगेश पाडगावकर यांचा वेग तुलना करण्यासाठी बघू. मंगेश पाडगावकरांचे समग्र साहित्य तसे त्यांच्या प्रकाशकांकडे संगणकावर उपलब्ध असणार. पण ते आपण थोड्याशा अदमासाने ताडू शकतो. त्यांच्या "गिरकी" ह्या काव्यसंग्रहात एकूण शब्द आहेत ८,८००. त्यांचे अशी एकूण पुस्तके आहेत:४५ (शेवटच्या "शब्द" पर्यंत ). तर त्यांची एकूण शब्दसंपदा भरेल अंदाजे: ४५*८८००=३,९६,००० शब्द ! आणि त्यांनी हे सर्व उभे केले वयाच्या २० व्या वर्षापासून आत्ताच्या ८२ व्या वर्षापर्यंत म्हणजे एकूण ६२ वर्षात. मग हा वेग भरतो दिवसाकाठी १७ शब्द ! सध्याच्या युगातले अगदी हातखंडा चपखल शब्द देणारे कवी सराव करतात दिवसाकाठी १७ शब्दांचा, तर ईतुका त्यांच्या दीडपट ! कवी मंगेश पाडगावकरांना ह्या तुलनेचा राग येणार नाही हे तर नक्कीच पण इथे तुकाराम महाराजांच्या प्रचंड प्रतिभेचे दर्शन घडते आणि ईतुका आकाशाएवढा हे सप्रमाण पहायला मिळते ! अगदी त्यांच्याच शब्दात " सकल संपूर्ण गगन जैसे ! "
अरुण अनंत भालेराव , १८६ / ए -१ , रतन पलेस ,गरोदियानगर ,घाटकोपर (पूर्व ) मुंबई -४०००७७ टेलिफोन : ९३२४६८२७९२