Saturday, January 3, 2015


अजातशत्रू शिवाजी क्षीरसागर 
------------------------------------------
जगाच्या जीवन-मरण्याच्या नियमात काही तरी बिघाड झालेला असावा . नाही तर अजातशत्रू असलेल्या आणि सर्वाबाबत अतिशय चांगले विचार बाळगणाऱ्या शिवाजी क्षीरसागरला असे अकाली मरण यावे हे अघटितच म्हणायला हवे. 
मी , शिवाजी , शरद मान्नीकार, मधू जामकर हे आम्ही हैद्राबादच्या विवेक वर्धिनीचे पाचवीपासून दहावी पर्यंतचे वर्ग -बंधू . शालेय जीवनाच्या असंख्य आठवणी आमच्या एकमेकात गुंतलेल्या आहेत. शिवाजी आमच्या शाळेतला स्कॉलर होता. खरे तर त्या काळात अर्धा एका मार्काचा फरक झाला तरी मित्रात काय भांडणे व्हायची . पण शिवाजीच्या स्कॉलरशिपचे आम्ही आनंदाने कौतुक करीत असू व शिवाजीही तेवढ्याच आत्मीयतेने तेव्हाच्या तुटपुंज्या ( साधारण सहा किंवा दहा रुपये असेल ) स्कॉलरशिपमधून आम्हाला इडली डोसाची पार्टी देत असे . पुढे त्याने काही वर्षे शिक्षण सोडून मुंबईला रिझर्व बँकेत नोकरी पत्करली होती तेव्हाही मुंबईला गेले की आम्ही शिवाजीच्या दिलदार पाहुणचारावर ताव मारीत असू . 
शार्दुलला मुंबईत नोकरी लागली होती तेव्हा आमची चांगली गळाभेट झाली होती. औरंगाबादी गेल्यावर तर त्याची हमखास भेट घेतच होतो. शमिकाच्या लग्नाला पापा कोरटकर व सगळे जुने वर्गमित्र भेटल्याने अपार आनंद झाला होता. त्यानंतर त्याला अमेरिकेला जायला मिळाले त्याने खूप बरे वाटले होते. 
पण एकाएकी असले दुर्धर दुखणे व्हावे काय व त्यात त्याची प्राणज्योत निवावी काय हे फारच अन्याकारक आहे असेच वाटते . इतक्या अजातशत्रू माणसाला नेण्याची घाई व्हावी ही नक्कीच चूक आहे . हे काही बरे नाही !
--------------------------------  

No comments:

Post a Comment