Friday, October 11, 2013

----------------------------------------
सतीश मुळे ह्याचा विनोदी स्वभाव !
-----------------------------------------
सगळे चांगले असले की माणसाला विनोद सुचतात, पण सतीश मुळे असा वेगळा होता की अडचणीतही त्याला विनोद सुचत व त्यावर आम्ही अनेक वेळा हसलो आहे. त्याने अकाली जाऊन मात्र आम्हाला अडचणीत आणले आहे.
हा अगदी लहान असताना, म्हणजे पाचसहा वर्षांचा असताना, बाबुराव मामा ( त्याचे वडील ) त्याला हैद्राबादी घेऊन आले होते. त्यावेळी त्याला पायात मोठे मोठे बूट घालावे लागत असत. पण त्यातही तो त्याचा खेळकरपणा टिकवून होता. पुढे मेडिकल करताना तर केवळ त्याच्या कुशाग्र बुद्धीमुळे व स्मरणशक्तीमुळे तो डॉक्टरकी पूर्ण करू शकला. त्याला वाचायला खूप त्रास होई, तेव्हा त्याचे मित्र खोलीवर येऊन त्याला वाचून दाखवत व तेव्हढ्यावर ह्याने सगळ्या परिक्षा यथोचित पार पाडल्या होत्या. हे त्याचे यश फारच कौतुकास्पद आहे.
त्याला सिनेमा नाटकांची फार चांगली अभिरुची होती व त्यामुळे कुठलाही नवा हिंदी सिनेमा आला की हा त्या सिनेमातल्या डॉयलॉग्जवर इतकी टिंगल करी की त्यामुळे आम्हालाही विनोदाची, विडंबनाची जाण यायला लागली होती.
त्याचे वडील आमच्याकडे आले की आम्हा लहान मुलांची चांगलीच परिक्षा घेत व त्यातून सहीसलामत सुटणे हे फार जिकीरीचे काम असे. पण बाबुराव मामांचा वारसा चालवत सतीशने सर्व कौटुंबिक, सामाजिक जबाबदार्‍या यशस्वीरित्या व हसतमुखाने पार पाडल्या आणि आज मामा असते तर त्यांना त्याचा रास्त अभिमान वाटला असता.
सतीशच्या कुटुंबियांना ह्या संकटातून पार पडण्यासाठी बळ मिळो हीच प्रार्थना व सतीशला अनेक प्रणाम !
------------------------------------------


Sunday, September 15, 2013



---------------------------------------
सुधाताई काळदाते
-----------------------
मी तेव्हा मॅट्रिकला होतो. औरंगाबादच्या स्टेशनावर त्यांना घ्यायला गेलो होतो. त्या अगोदर हैद्राबादी असताना बापू काळदाते आमच्याकडे येत असत. तेव्हा आमच्या बैठकीच्या खोलीत एक टेबल असे. त्याखाली बसून मी जे काहीबाही वाचे त्यात मी बापूंच्या फाईलीतली त्यांनी सुधाताईंना लिहिलेली प्रेमपत्रेही वाचलेली होती. बापूंच्या पत्रांचा मायनाच मोठा रोमांचकारी असे. ते लिहीत: "प्रिय सु".
त्यावरून कोणीतरी सुंदर नखरेल मुलगी असावी असे वाटून मी त्यांची वाट पाहात होतो. तर, ह्या बाई आपले सामान स्वत: उचलत, टांगेवाल्याला पत्ता सांगत होत्या व मला पुढे टांगेवाल्याशेजारी बस म्हणत बसल्याही. मध्येच अर्ध्या वाटेवर त्यांच्या लक्षात आले की त्यांचा होल्डऑल गाडीतच राहिला होता. त्यांनी लगेच टांगा परत वळवायला सांगितला. त्या काळात डब्यांबर काही पाच आकडी नंबर असत व त्यांनी आपल्या डब्याचा नंबर लिहून ठेवलेला होता. त्यांनी स्टेशन-मास्तरांना सांगून पुढील स्टेशनावर तो होल्डॉल उतरवून घ्यायची व्यवस्था केली होती. संसार थाटायला औरंगाबादी आलेली एक स्वप्नाळू मुलगी ( प्रसिद्ध रविकिरण मंडळाचे कवि वा.गो.मायदेव ह्यांची मुलगी ) प्रत्यक्षात हे अवघड काम सहजी फत्ते करून दाखवीत होती. पहिल्याच दिवसांपासून मी सुधाताईंचे हे कर्तृत्व पाहिलेले होते.
पुढे त्यांनी औरंगाबादच्या आजूबाजूच्या खेड्यात सामाजिक कार्यकर्ती म्हणून जे काम केले त्याची रोजची वर्णने त्या आम्हाला रात्रीच्या शिळोप्याच्या गोष्टींसारख्या सांगत असत. आज एका बाईने उगाच उपदेश करू नकोस, भाकर्‍या करून देतेस का असे म्हणून कसे आवाहन दिले होते ते एक दिवस त्या सांगत व त्याचबरोबर तिथेच तिला कशा भाकर्‍या करून दिल्या त्याचेही वर्णन त्या खेळीमेळीने सांगत असत.
बापू त्या काळी राजकारणात भटकंती करीत असताना, नोकरी, पिएच.डी व दोन मुलींची देखरेख त्या कशी करीत असत हे मी फार जवळून पाहिलेले आहे. कांचन लहान असताना मी तिची तासन्‌ तास सोबत केलेली आहे. आदर्श जोपासणे व संसारही नेकीने प्रेमाने कसा करावा ह्याचा वस्तुपाठच त्या वेळी आम्हाला देत होत्या.
एकदा वा.गो.मायदेव औरंगाबादी आलेले असताना त्या काही कारणांनी दु:खीकष्टी झालेल्या असताना मला सांगत होत्या की अपेक्षा केल्या ना की दु:ख होतेच ! काळाच्या पाशात अडकून न राहता आपला आदर्श संसार कसा करावा हेच त्यांनी आपल्या जगण्याने दाखवून दिले होते. जणु काही वडिलांच्या ( वा.गो.मायदेवांच्या ) एका प्रसिद्ध कवितेच्या ओळींसारखे :
" हे पंजरस्थ पक्षा, नुसते कशास गाशी ?
हो काय, गाऊनिया, गुंतून काळपाशी ! "
काळाच्या पाशाला तोडून काळाचे दान देणार्‍या सुधाताई काळदातेंचे स्मरण मला कायमच होत राहील , होत राहू दे !
-------------------------------------------

Thursday, November 17, 2011

सु-बापू काळदाते
मराठीत शब्दाच्या आधी सु हा प्रत्यय आला की त्या शब्दाचा अर्थ चांगलाच होतो असे आढळते. बापू काळदाते ह्यांनाही सु ( सुधाताई ) च्या टापटिपीचा प्रत्यय आला तेव्हाच त्यांचे जीवन चांगल्या अर्थाचे झाले असावे. बापूंबरोबर सुधाताईंची आठवण होण्याचे कारण बापू तेव्हा एक सेवादलाचे कार्यकर्ते म्हणून हैद्राबादी आमच्याकडे आले होते. खादीचे कपडे, एक शबनम बॅग व खळखळून बोलणे, हसणे ह्यांनी तेव्हा आमच्या घरावर त्यांचा खूपच प्रभाव पाडला होता. बैठकीत गप्पा चालत तेव्हा कोपर्‍यातल्या टेबलाखाली बसून मी काहीबाही वाचत असे व गप्पांकडे लक्ष ठेवून असे. बापूंची पिशवीही टेबलाजवळच होती. सातवीतल्या मुलाच्या उत्सुकतेला त्यातली एक फाईल बघाविशी वाटली. आणि आदर्श प्रेमपत्रे कशी असावीत त्याचा वस्तुपाठच मला वाचायला मिळाला. बापू व सुधाताईंनी एकमेकाला लिहिलेली प्रेमपत्रे त्यात नीट फाईल केलेली होती. त्यावेळेस सुधाताई सु हे टोपणनाव वापरीत असाव्यात, कारण पत्रांच्या मायन्यात "प्रिय सु" असे असायचे.
पुढे सुधाताईंचे बापूंशी लग्न झाल्यावर त्या पहिल्यांदा औरंगाबादी आल्या तेव्हा त्यांना आणायला रेल्वे-स्टेशनवर मीच एकटा गेलो होतो. आता मी मॅट्रिकला होतो. त्या पहिल्या भेटीतच सुधाताईंचे वेगळेपण अनुभवायला आले. आम्ही रीतसर स्टेशनबाहेर येऊन टांग्यात बसलो ( त्याकाळी घोड्याचे टांगेच होते ), अर्ध्या रस्त्यावर आलो आणि सुधाताईंच्या लक्षात आले की एक होल्डऑल उतरताना काढून घ्यायचाच राहिला. आम्ही परत स्टेशनवर गेलो. सुधाताईंनी डब्याचा नंबर टिपून घेतलेला होता. तोंवर डब्यांना नंबर असतात हेही मला माहीत नव्हते. स्टेशनमास्तरला सांगून त्यांनी पुढच्या स्टेशनवर तो होल्डऑल काढून घेऊन तो परत पाठवण्याची व्यवस्था करून घेतली आणि संध्याकाळपर्यंत तो होल्डऑल औरंगाबादी पोचलाही. त्याकाळी रेल्वेकडून असले अचाट कर्त्तत्व करवून घेणा‍र्‍या त्या एक धाडशी महिला होत्या.
बापू जरी राजकारणातल्या रुक्ष व्यवहारात गुंतलेले असायचे तरी त्यांनी रसिकता चांगलीच जपलेली होती. आणि ते त्यांच्या सेवादलात असण्यापासून दिसत होते. वसमतला वीस दिवसांचा सेवादलाचा कॅंप होता. त्याला मी होतो. आता कॅंपचे सगळे कार्यक्रम बापूंनी रीतसर घेतले व त्यात कमाल म्हणजे त्यांनी आम्हा मुलांना तिथून नांदेडला नेले, आठवडाभरासाठी. तिथे नरहर कुरुंदकर आम्हाला जीवनराव बोधनकरांच्या घरी, रोज दोन तीन तास, मर्ढेकरांच्या कविता समजावून सांगत. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना त्या काळात एका सेवादलाच्या कार्यकर्त्याने नरहर कुरुंदकरांसारख्या व्यासंगी साहित्यिकाकडून, मर्ढेकरांच्या कवितांची ओळख करून द्यावी, ह्यात त्यांच्या रसिकतेची प्रगल्भ जाणच दिसून येते आणि इथे परत हे वा.गो.मायदेव ह्या प्रसिद्ध कवीची मुलगी असलेल्या सुधाताईंचे त्यांना प्रत्यय असल्याने झाले असावे, हेही उघड होते.
राजकारणात नुकत्याच पदार्पण करतानाचे बापूंचे उमेदीचे दिवस ( एका विद्यार्थ्याच्या नजरेने ) मी अगदी जवळून पाहिले आहेत. जेव्हा पब्लिक-स्पीकींग म्हणजे काय असते हे कोणालाही माहीत नव्हते, तेव्हा बापू एखाद्या भाषणाची तयारी आरशासमोर उभे राहून तासन्‌ तास करताना मी पाहिलेले आहे. एखादे कसब कमवायचे तर त्याचा शास्त्रोक्त अभ्यास व सराव करावा हा दृष्टिकोनच मोठा उमदा आहे. असेच समाजवाद कसा असावा, हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाह्यला मिळालेले ते एक अपवादात्मक समाजवादी आहेत. कारण त्या काळात ते इस्त्राईलला जाऊन त्यांच्या पंतप्रधानाला, बेन गुरियान, ला भेटून आले होते. त्यांनी सांगितलेली एक समाजवादाची प्रचीती मला अजून लक्षात आहे. बापूंची भेट झाल्यावर बेन गुरियान बापूंना कारने पोचवायला आले होते व नंतर स्वत: बसच्या लाइनीत उभे राहिले होते. आजकालच्या बरबटलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर तर वाटते, समाजवाद असावा तर असा !
त्या काळात समाज कार्याला झोकून दिलेले हे मोठे मोहक दांपत्य होते. बापू दौर्‍यात व्यस्त असत, तर सुधाताई खेड्यापाड्यांनी सोशल वर्करचे काम करीत असत. त्या दरम्यान त्यांच्या पहिल्या मुलीचे, कांचनचे, संगोपन करण्यात मला खारीचा वाटा उचलायला मिळाला ह्याचे मला खूप अप्रूप आहे. ज्यांनी एका ध्येयापायी आपला संसार पणाला लावला, त्यांना देवाने सोन्यासारख्या मुली द्याव्यात, हा दैवी न्यायच म्हणायला हवा ! असेच त्याने सुधाताईंना बळ व बापूंच्या आत्म्याला शांती द्यावी !

----------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

-----------------------------------------------------------------

Monday, November 14, 2011

अभिमान बाळगावा असे डॉ.अहंकारी
६ नोव्हेंबर २०११ ला औरंगाबादी "अनंत भालेराव-स्मृती-पुरस्कार" डॉ.शशिकांत अहंकारी ह्यांना देण्यात आला. डॉ.अहंकारी व त्यांच्या गायनॅकॉलॉजिस्ट पत्नी डॉ.शुभांगी अहंकारी हे दांपत्य, एका खेड्यात ( अणदूर, तुळजापूर तालुक्यात, उस्मानाबाद जिल्ह्यात, सोलापूर पासून ४० किमी वर हे खेडे आहे) एक अतिशय मोलाचे काम करीत आहेत. त्याचा हा सन्मान आहे. हा २३वा वार्षिक स्मृती-पुरस्कार ह्या आधी निरनिराळ्या क्षेत्रातल्या प्रथितयशांना मिळालेला आहे, जसे: कुमार केतकर, वसंत पळशीकर, अप्पा जळगावकर, गोविंद तळवलकर, ना.धों.महानोर, मंगेश पाडगावकर, वगैरे.
अणदूर ह्या खेड्यात अहंकारींनी हॅलो ( हेल्थ ऍंड ऍटो लर्निंग ओर्गनाइझेशन ) नावाची संस्था काढली आहे. डॉ.अहंकारी औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजात विद्यार्थी असतानाच युक्रांद वगैरे सारख्या चळवळीतल्या मित्रांना घेऊन सुट्ट्यात स्वयंसेवी आरोग्य सेवा आसपासच्या खेड्यात पुरवत असत. पुढे डॉक्टर झाल्यावर ह्या कामाची पूर्णवेळी सुरुवात त्यांच्या आईच्या नावे काढलेल्या "जानकी रुग्णालया"ने झाली व सध्या त्यांचा "भारत-वैद्य" नावाचा प्रकल्प सरकारनेही वाखाणला आहे. गावोगावच्या खेड्यापाड्यातून थोड्याशा ( इयत्ता ८ ते १२) शिकलेल्या स्त्रियांना ते ५० दिवसांच्या प्रशिक्षणात प्राथमिक आरोग्याचे व विशेषत: माता-बाल-संगोपनाचे प्रशिक्षण देतात. ह्यांना ते "भारत-वैद्य" म्हणतात. अशा ७५ भारत-वैद्य स्त्रिया ७० खेड्यापाड्यातून अवघ्या पाच रुपये/दर रुग्णामागे, एव्हढ्या अल्प खर्चात, हे आश्चर्यकारक काम करतात. ह्याबाबतीत त्यांचा एक नाराच आहे: "एसटीच्या खर्चात, उपचार गावात".मग ह्या भारत-वैद्य स्त्रिया त्यांच्या गावात घरोघरी जाऊन प्राथमिक आरोग्य-सेवा देतात. हे काहीसे चीनच्या बेअर-फुट डॉक्टर्स सारखेच आहे. ह्या मूलभूत प्रशिक्षणाला हलके लेखू नका. कारण ह्या मूलभूत ज्ञानामुळे लबाड डॉक्टरांची ह्या खेडवळ स्त्रिया कशी बोबडी वळवतात त्याचा एक किस्सा ऐका. एका मुलाच्या पोटात खूपच दुखत असते. प्राथमिक उपचाराने बरे वाटत नाही. मग शेजारीपाजार्‍यांच्या मदतीने ती भारत-वैद्य त्याला शहराच्या ठिकाणी घेऊन जाते. शहरातला डॉक्टर म्हणू लागतो ह्याच्या पोटात डावीकडे जे दुखते आहे ते ऍपेंडिक्स मुळे व ते फुटायच्या आत त्याचे ऑपरेशन करणे जरूरीचे आहे व त्याला साधारण दहा हजार खर्च येईल. भारत-वैद्य म्हणते की आम्हाला शिकवले आहे की ऍपेंडिक्स तर उजवीकडे असते तर मग हे दुखणे ऍपेंडिक्सचे कसे असेल ? त्या पोराचे दुखणे मग दुसर्‍या डॉक्टराकडून मिटवल्या जाते व लबाड डॉक्टरांची लबाडी एका प्राथमिक आरोग्याच्या शिक्षणाने उघडकीला येते.
स्त्रियांविषयीच्या अपार कणवेपायी डॉक्टर अहंकारी दांपत्याने अडाणी स्त्रीलाही समजेल अशा चाचण्या अमलात आणून रूढ केल्या आहेत. जसे एकदा एका मुलीने एका भारत-वैद्याला विचारले होते की "एचबी" म्हणजे काय ? त्यावर मग डॉक्टरांनी हेमोग्लोबीनचे गरोदरपणातले महत्व समजावून सांगितले व भारत-वैद्यांना शिकविले की फक्त बाळंतिणीची नखे बघा. ती फिकी असतील तर हेमोग्लोबिन कमी आहे, लोहगोळ्या द्या, लालसर असतील तर ठीक आहे. शोधाची जननी गरज असते, हेच इथे पहायला मिळते. असेच त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान ते जे अभिनव प्रयोग योजतात त्याला दाद द्यावी. उदाहरणार्थ स्त्रीची शरीर-रचना समजावताना ते फरशीवर बाईची आकृती खडूने काढतात व मग त्यात यकृत, किडनी, योनी वगैरे अवयव रंगीत खडूने भरतात. हा ग्रामीण ऍनॉटॉमीचा वर्ग मोठा मनोहारी वाटतो व प्रभावीही.
डॉ. अहंकारींनी अतिशय कल्पकतेने "माता-दत्तक-योजना" तिथे राबवली आहे. वस्तीतल्यांच्या मदतीने तिथली भारत-वैद्य स्त्री गरोदर मातेला दत्तक घेते. तिने १२ आठवड्याच्या आत दवाखान्यात नाव नोंदवले का नाही, धनुर्वाताची तीन इंजेक्शने घेतली की नाही, शंभर लोहगोळ्या घेतल्या की नाही व योग्य आहार वेळच्या वेळी घेतला की नाही ही अगदी प्राथमिक आरोग्याची काळजी वाहते. ह्या जुजबी काळजीमुळे माता-बालक-मृत्यूचे प्रमाण घटते, व आयुष्याची सुरुवात नेमकी व विश्वासक होते. ह्यामुळेच सोलापूरच्या गरीब वस्त्यात ते ह्या चळवळीचे नाव "शुअर स्टार्ट" असे ठेवतात जे अतिशय चपखल असेच आहे.
सोलापूर हे अणदूरजवळ असलेले मोठे शहर. अहंकारींनी इथल्या झोपडपट्टीसारख्या गरीब वस्तीत मोठा यशस्वी उपक्रम राबवला आहे. ८० वस्त्यातील २ लाख स्त्रियांना बचतगटाच्या माध्यमातून आरोग्यसेवा पुरवल्या आहेत. बचतगटामार्फत स्त्रियांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिल्या जाते. गाई, म्हशी, दळण-कांडणाची लहान यंत्रे, दुकानांसाठी मदत वगैरे. ह्यासंबंधी अहंकारींचा अनुभव अगदी ह्रद्य आहे. एका बाईने बचत गटाकडून एक गाय घेतलेली असते. त्यासाठी तिने बचत-गटाला अवघे ६० रुपये भरलेले असतात. पण तिच्या नवर्‍याला तिने त्याची परवानगी न घेता हा कारभार केला हे आवडत नाही. तो तिला बेदम मारतो व घरातून काढून टाकतो. ह्यावर ती बाई, डोळे पुसते व गाय घेऊन जाऊ लागते. नवरा म्हणतो, गाय कशाला नेतेस ? त्यावर ती म्हणते बचत गटाने दिलीय, त्यांची त्यांना परत करते व जाते. ह्या अनुभवातून आत्मसन्मानासाठी स्त्रिया कशा तयार होत आहेत त्याचेही समाजाला भान यावे.
स्त्री-भ्रूण-हत्या विरोधात काम करीत असताना डॉ. अहंकारी एक विदारक प्रसंग सांगतात, ज्यामुळे कोणाही पुरुषाला लाज वाटावी. त्यांची एक कार्यकर्ती असते. ती सरपंच म्हणून निवडून येते. नवर्‍याचा प्रथम पाठिंबा असतो. पण नंतर तिच्या कामामुळे तिचे जागोजागी सत्कार व्हायला लागतात. ते सहन न होऊन मग तो तिला मारहाण करायला लागतो. बाईला एके वेळी भर सभेत तिच्या पाठीवरचे वळ दाखवावे लागतात. ह्या पुरुषी अहंकारामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना आजही प्रचंड त्रास होतो. कदाचित ह्या पुरुषी अहंकाराची सतत जाणीव रहावी म्हणूनच स्वत: अगदी निर-अहंकारी आणि कोणीही अभिमान बाळगावा असे ते असूनही डॉक्टरांनी अहंकारी हे आडनाव अजूनही जपले असावे.
असेच ग्रामीण भागात जी माणूसकी गरीबीमुळे जपली जाते त्यावर शहरी मध्यमवर्गीयांनी विचार करावा अशी घटना अहंकारींच्या कामात घडलेली आहे. ती अशी: एका बाईला तिच्या वस्तीत, कचर्‍यात एक नवजात मूल टाकून दिलेले सापडते. सगळ्या आजुबाजूच्या बायका, भारत-वैद्य, एकत्र येऊन ठरवतात की ह्या मुलीला सगळी वसतीच दत्तक घेईल व ह्या वसतीतच वाढवील. ज्याने टाकून दिलेय त्याच्या देखत. मग सगळ्याजणी मिळून पोलिसात जाऊन, रीतसर कारवाई करून, ती मुलगी वाढवितात, तिचा दरवर्षी वाढदिवस साजरा करतात. शहरातल्या संवेदनाशून्य झालेल्या वागण्यावर हे झणझणीत अंजनच जणू. ग्रामीण कळवळीचा पाठ शहरी जनतेने गिरवावा असेच हे कर्तृत्व आहे !
बाबा आमटे, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव ह्यांच्या पाठबळाने डॉक्टर अहंकारी ह्यांचा समाजकार्याचा आवाका खूपच मोठा झालेला आहे. त्यांचे व्हिजन-वाक्यच मुळी आहे: निरोगी, स्वावलंबी व न्यायी समाज. आणि ह्यासाठी संस्थेचे व्रत ( मिशन ) त्यांनी ठेवले आहे: दुर्लक्षित घटकांचे संघटन, संस्था व शासन ह्यांच्यात समन्वय, व वैज्ञानिक दृष्टिकोनातून निरोगी व स्वावलंबी समाज निर्माण करणे. ह्या आवाक्यामुळे त्यांच्या उपक्रमात अंतर्भूत आहेत : सावली केंद्र ( स्त्रियांवरील हिंसाचार रोखण्यासाठी हस्तक्षेप ); किशोरी प्रशिक्षण ( शिवण क्लास, छंदवर्ग, वाचनालय, सायकल चालविणे, वगैरे ); कलापथक ( लोककलेतून आरोग्य संवाद साधण्यासाठी ह्यात बालविवाह, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या, विरोधी जनजागरण केले जाते ); ग्रामीण विज्ञान केंद्र ( ३० विद्यालयातील ८०० विद्यार्थी विज्ञान-प्रयोग शाळेचा लाभ घेतात. विज्ञान वाहिनी पुणे, व दुर्गादेवी ट्रस्ट पुणे त्यांना मदत करतात ); शाश्वत शेती ( सेंद्रीय शेतीचा प्रचार व प्रयोग ह्यासाठी १० गुंठे शेतीत महिलांना शेतीव्यवसायातल्या प्रयोगांची ओळख करून देण्यात येते);
डॉ. अहंकारींच्या अनेक प्रकल्पांना नामवंत संस्थांचे पाठबळ मिळते आहे. त्यात ऑक्सफॅम, फोर्ड फौंडेशन, युनिसेफ, स्विस-एड, सिद्धिविनायक ट्रस्ट, महाराष्ट्र फौंडेशन, व पाथ ह्या सेवाभावी संस्था त्यांच्या प्रकल्पांचा मरातब वाढवतात. "भारतवैद्यक डायरी आरोग्याच्या विकासाची" हे पुस्तक ग्रंथाली वाचक चळवळीने प्रकाशित केले आहे. तसेच युनिक फीचर्स तर्फे "खरेखुरे आयडॉल्स"मध्येही अहंकारी ह्यांचा अंतर्भाव आहे. "वेगळ्या वाटांचे प्रवासी" ह्या साकेत प्रकाशनातही त्यांची माहीती आहे. पाहता पाहता ह्या कार्याला आता १५ वर्षे होत आली आहेत. जिथे शहरातून अहंकारींचा सत्कार होतो वा सभा होतात त्याला ते त्यांच्या खेड्यातल्या १५/२० स्त्री -कार्यकर्त्यांना आवर्जून बरोबर घेऊन जातात, ज्यामुळे शहरातल्यांची व खेड्यातल्यांची जनजागृती होते. अहंकारींचा मुलगा सध्या इंग्लंडात एका संशोधनवृत्तीवर काम करतोय, त्यावरून हा वसा पुढच्या पिढीतही जपला जात आहे त्याची धन्यता वाटते. जगन्नाथाच्या रथाला जसे जितकी माणसे ओढतील तितके ते दैवत सहजी विराजते, तसेच मानून सर्व सेवाभावी लोकांनी ह्या संस्थेला अवश्य मदत करावी. त्यांचा पत्ता आहे : हॅलो मेडिकल फौंडेशन, जानकी रुग्णालय, अणदूर, ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद--पिन कोड: ४१३६०३ ( महाराष्ट्र ) व ई-मेल : shashikant.hmf@gmail.com आणि संकेत-स्थळ आहे: www.halomedicalfoundation.org

-------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

-------------------------------------------------------

Saturday, November 12, 2011

अभिमान बाळगावा असे डॉ.अहंकारी
६ नोव्हेंबर २०११ ला औरंगाबादी "अनंत भालेराव-स्मृती-पुरस्कार" डॉ.शशिकांत अहंकारी ह्यांना देण्यात आला. डॉ.अहंकारी व त्यांच्या गायनॅकॉलॉजिस्ट पत्नी डॉ.शुभांगी अहंकारी हे दांपत्य, एका खेड्यात ( अणदूर, तुळजापूर तालुक्यात, उस्मानाबाद जिल्ह्यात, सोलापूर पासून ४० किमी वर हे खेडे आहे) एक अतिशय मोलाचे काम करीत आहेत त्याचा हा सन्मान आहे.
अणदूर ह्या खेड्यात अहंकारींनी हॅलो ( हेल्थ ऍंड ऍटो लर्निंग ओर्गनाइझेशन ) नावाची संस्था काढली आहे. सुरुवात त्यांच्या आईच्या नावे काढलेल्या "जानकी रुग्णालया"ने झाली व सध्या त्यांचा "भारत-वैद्य" नावाचा प्रकल्प सरकारनेही वाखाणला आहे. गावोगावच्या खेड्यापाड्यातून थोड्याशा ( इयत्ता ८ ते १२) शिकलेल्या स्त्रियांना ते एक महिन्याच्या प्रशिक्षणात प्राथमिक आरोग्याचे व विशेषत: माता-बाल-संगोपनाचे प्रशिक्षण देतात. ह्यांना ते "भारत-वैद्य" म्हणतात. मग ह्या भारत-वैद्य स्त्रिया त्यांच्या गावात घरोघरी जाऊन प्राथमिक आरोग्य-सेवा देतात. हे काहीसे चीनच्या बेअर-फुट डॉक्टर्स सारखेच आहे. ह्या मूलभूत प्रशिक्षणाला हलके लेखू नका. कारण ह्या मूलभूत ज्ञानामुळे लबाड डॉक्टरांची ह्या खेडवळ स्त्रिया कशी बोबडी वळवतात त्याचा एक किस्सा ऐका. एका मुलाच्या पोटात खूपच दुखत असते. प्राथमिक उपचाराने बरे वाटत नाही. मग शेजारीपाजार्‍यांच्या मदतीने ती भारत-वैद्य त्याला शहराच्या ठिकाणी घेऊन जाते. शहरातला डॉक्टर म्हणू लागतो ह्याच्या पोटात डावीकडे जे दुखते आहे ते ऍपेंडिक्स मुळे व ते फुटायच्या आत त्याचे ऑपरेशन करणे जरूरीचे आहे व त्याला साधारण दहा हजार खर्च येईल. भारत-वैद्य म्हणते की आम्हाला शिकवले आहे की ऍपेंडिक्स तर उजवीकडे असते तर मग हे दुखणे ऍपेंडिक्सचे कसे असेल ? त्या पोराचे दुखणे मग दुसर्‍या डॉक्टराकडून मिटवल्या जाते व लबाड डॉक्टरांची लबाडी एका प्राथमिक आरोग्याच्या शिक्षणाने उघडकीला येते.
डॉ. अहंकारींनी अतिशय कल्पकतेने "माता-दत्तक-योजना" तिथे राबवली आहे. वस्तीतल्यांच्या मदतीने तिथली भारत-वैद्य स्त्री गरोदर मातेला दत्तक घेते. तिने १२ आठवड्याच्या आत दवाखान्यात नाव नोंदवले का नाही, धनुर्वाताची तीन इंजेक्शने घेतली की नाही, शंभर लोहगोळ्या घेतल्या की नाही व योग्य आहार वेळच्या वेळी घेतला की नाही ही अगदी प्राथमिक आरोग्याची काळजी वाहते. ह्या जुजबी काळजीमुळे माता-बालक-मृत्यूचे प्रमाण घटते, व आयुष्याची सुरुवात नेमकी व विश्वासक होते. ह्यामुळेच सोलापूरच्या गरीब वस्त्यात ते ह्या चळवळीचे नाव "शुअर स्टार्ट" असे ठेवतात जे अतिशय चपखल असेच आहे.
स्त्री-भ्रूण-हत्या विरोधात काम करीत असताना डॉ. अहंकारी एक विदारक प्रसंग सांगतात, ज्यामुळे कोणाही पुरुषाला लाज वाटावी. त्यांची एक कार्यकर्ती असते. ती सरपंच म्हणून निवडून येते. नवर्‍याचा प्रथम पाठिंबा असतो. पण नंतर तिच्या कामामुळे तिचे जागोजागी सत्कार व्हायला लागतात. ते सहन न होऊन मग तो तिला मारहाण करायला लागतो. बाईला एके वेळी भर सभेत तिच्या पाठीवरचे वळ दाखवावे लागतात. ह्या पुरुषी अहंकारामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना आजही प्रचंड त्रास होतो. कदाचित ह्या पुरुषी अहंकाराची सतत जाणीव रहावी म्हणूनच स्वत: अगदी निर-अहंकारी आणि कोणीही अभिमान बाळगावा असे ते असूनही डॉक्टरांनी अहंकारी हे आडनाव अजूनही जपले असावे.
डॉ. अहंकारींच्या अनेक प्रकल्पांना नामवंत संस्थांचे पाठबळ मिळते आहे. त्यात ऑक्सफॅम, फोर्ड फौंडेशन, युनिसेफ, स्विस-एड, सिद्धिविनायक ट्रस्ट, महाराष्ट्र फौंडेशन, व पाथ ह्या सेवाभावी संस्था त्यांच्या प्रकल्पांचा मरातब वाढवतात. जगन्नाथाच्या रथाला जसे जितकी माणसे ओढतील तितके ते दैवत सहजी विराजेल, तसेच मानून लोकांनी ह्या संस्थेला अवश्य मदत करावी. त्यांचा पत्ता आहे : हॅलो मेडिकल फौंडेशन, जानकी रुग्णालय, अणदूर, ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद--पिन कोड: ४१३६०३ ( महाराष्ट्र ) व ई-मेल : shashikant.hmf@gmail.com आणि संकेत-स्थळ आहे: www.halomedicalfoundation.org

-------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

Tuesday, October 4, 2011

द भालेराव---१७
तब्येतीत हसणे !

आमच्या आईच्या दुखण्याचे एक मोठेच प्रकरण होते. ती होणार्‍या त्रासाचे नक्कीच इतरांना ऐकवी पण ते केवळ तुम्ही ऐका, एवढ्याच अपेक्षेने असायचे व त्यावर ती स्वत:ही हमेश: विनोदाने चेष्टा करायची. एकदा एका एम.डी.च्या विद्यार्थ्याला घेऊन ती मुंबईला आली होती. त्या विद्यार्थ्याच्या कोणी गाईड, सायन हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागाच्या प्रमुख होत्या. त्याने माझ्या आईला त्यांना दाखवण्याचा घाट घातला होता. मीही बरोबर गेलो होतो. प्रमुख बाई पारशी होत्या. त्या टिपिकल पारशी मराठीत म्हणाल्या, हं सांगा हिस्ट्री ! त्यावर आमची आई म्हणाली कुठून सांगू ? त्या म्हणाल्या अगदी "पहिले पासनं". त्यावर आईनं विचारलं औषधांची हिस्ट्री सांगू का रोगांची. त्यावर त्या बाई हसल्या खर्‍या, पण आई घेत असलेली कित्येक औषधे इतिहासजमा झालेली होती हे ती हिस्ट्री सांगत असताना माझ्या ध्यानात आले.
असेच आमच्या वडिलांचे केईएम मध्ये थायमेक्टोमीचे ऑपरेशन झाले तेव्हा सगळ्यांचे लक्ष त्यांच्या तब्येतीकडेच असायचे व ते साहजिकच होते. पण आईला आपल्याच तब्येतीचे असलेले कौतुक स्वस्थ बसू देत नसे. एकदा सकाळी हॉस्पिटलला जाताना ती म्हणू लागली की खरं म्हणजे तिचीच तब्येत काळजीची आहे. वडिलांचे काय फक्त ऑपरेशनच तर आहे. पण तिची तब्येत किती बेभरवशाची . त्यावर मग मी म्हटलं की आज आपण जरा लवकर आलो आहोत तर समोरच्या हॉटेलात नाश्ता घेऊ व त्यावेळेस तू तुझ्या तब्येतीचे सवीस्तर सांग, मग तसे दाखवू. ह्यात स्वत:च्या तब्येतीचे कौतुक जितके होते तेव्हढेच एक खेळकरपणे त्या त्रासाचे झेलणे होते. नंतर वडिलांची तब्येत जरा काळजीची झाली तेव्हा सगळ्या डॉक्टरांसमोरही तिने हेच म्हटले की तिचीच तब्येत ज्यास्त काळजीची आहे, तेव्हा खोलीतले टेंशन तिच्या ह्या खेळकर तक्रारीने एकदम उतरले होते.
सगळ्या तपासण्या झाल्या की सगळेच डॉक्टर तिच्या क्रॉनिक डिसेंट्रीची "मानसिक" म्हणून बोळवण करीत. ती स्वत:ही जितके डिसेंट्रीचे लाड करायची तितकीच खेळकरपणे त्याचे टेंशन घालवण्यासाठी म्हणायची "आजचा स्कोअर दोन आकडी झालाय !" तिच्या तब्येतीच्या कौतुकाची परमावधी म्हणता येईल असा प्रसंग हैद्राबादी मी दुसरीत असताना झाला होता. हैद्राबादचे आरोग्यमंत्री असलेले डॉ.मेलकोटे आमच्या वडिलांच्या फार परिचयाचे होते. त्यांचे एक सॅनेटोरियम शहरातच होते. त्यांना तब्येत दाखवल्यावर त्यांनी आईला सॅनेटोरियममध्येच दाखल करून घेतले होते. इतके अलिशान सॅनेटोरियम होते की एक प्रशस्त बंगलाच आमच्या आईला देण्यात आला होता. नर्सेस, डॉक्टर सदैव तैनातीत असायचे. मी शाळा सुटली की सायकलने तिचा जेवणाचा डबा घेऊन यायचो. त्यावेळी मला सायकलच्या सीटवर बसता येत नसे. मी तेव्हा सायकल-कैंचीतच चालवायचो. सॅनेटोरियमच्या निवांतपणाचा मला असा फायदा झाला की तिथल्या प्रशस्त आवारात मी सीटवरनं सायकल चालवायला शिकलो. चांगले महिना दीड महिना आईने सॅनेटोरियमचा पाहुणचार घेतला होता. त्याच दरम्यान जवाहरलाल नेहरूंनी त्या सॅनेटोरियमला भेट दिली होती व मी त्यांना तिथलेच गुलाबाचे फूल दिले होते. डॉक्टर मेलकोटेंसारखेच जवाहरलालही एकदम लालबुंद गोरे होते. त्या दरम्यान ती दुखण्याचे कमी व सॅनेटोरियमचे कौतुक सगळ्यांना हटकून सांगायची.
एखाद्या व्याधीवर हसणे, त्याची चेष्टा करणे हा माणसाचा जणू स्वभावच होऊन जात असावा. आई स्वत:च्या त्रासाचे जितके कौतुक करायची किंवा करवून घ्यायची त्याहीपेक्षा त्याची चेष्टा उडवणे हे तिच्या अंगवळणीच पडले होते. शेवटी शेवटी तिला विस्मरणाचा त्रास होतोय असे अशोक सांगे. मी एकदा त्याला विचारले की म्हणजे काय म्हणते ती ? तर सांगायला लागला की तिच्या खोलीत कोणी नसले की जोराने ती हाका मारी. कोणी दाद नाही दिली तर मोठ्याने "अशोक अनंतराव भालेराव" अशी सबंध नावाने हाका मारी. त्यावर अशोकने तिला सांगायचा प्रयत्न केला, की असं बरं नाही, लोकं नावं ठेवतात. त्यावर तिनं विचारलं की कोण नावं ठेवतात. बापू काळदाते शेजारीच असतात. अशोकने त्यांचे नाव सांगताच आई म्हणाली म्हणे की अं, त्यांचं काय एवढं, आपणच तर त्यांना औरंगाबादला आणलंय, त्यांचं सगळं केलंय त्यावेळी ! अशोक हे तिच्या विस्मरणाचे म्हणून सांगत होता व ते मला तिच्या कणखरपणाचे, हसून टाळण्याचे वाटत होते.
प्रकाश चिटगोपीकराचेही असेच हसून निभावणे मोठे मजेशीर होते. त्याची जे.जे.त शस्त्रक्रिया झाल्यानंतर आम्ही त्याच्या विचारपूशीला गेलो तेव्हा त्याने छातीत येणार्‍या कळीचे जे बहारदार वर्णन केले होते, त्यावरून ते दुखणे की त्याची टर असेच कोणाला वाटावे. नागनाथराव परांजपे हे सुद्धा स्वत:ला फार जपत. थोडीही सर्दी झाली की डोक्याला टॉवेल वगैरे गुंडाळीत, पांघरूण घेत. व वर म्हणत की बाबा हे शरीर ह्या राष्ट्राची संपत्ती आहे ! दुखणे हे कौतुक करूनही न जाणारे झाले की माणूस मग त्याची हसूनच जिरवायचा प्रयत्न करतो तो असा ! ह्यात त्या दु:खाला सहानुभूती मिळवण्यापेक्षा त्यावर हसणेच हा माणसाचा स्वभाव होतो !
---------------------------------------------------------------------------

Friday, April 29, 2011

द भालेराव-----१६
प्रदीपचे जल-निर्वाण !
आयुष्याचे मोठे गमतीचे असते. ते असते तेव्हा जाणवत नाही व नसते तेव्हा ते ताणवत रहावे असे वाटत राहते.
प्रकाश चिटगोपेकरचा भाऊ व तितकाच दुसर्‍या टोकाचे व्यक्तिमत्व असलेला प्रदीप चिटगोपेकर गेला, तेव्हा त्याचे हे जल-निर्वाण अकालीच झाले असे वाटले. बदलापूरच्या स्मृति-गंधच्या मेळाव्यात आपण त्याचा सत्कार करतोकाय, त्याच्या "जल-संवाद" ह्या मासिकाबद्दल अचंबित होतो काय आणि एक वर्ष होत नाही तोच, त्याच्या नसण्याची हळहळ जाणवावी, ही काळाची अगाध करणीच म्हणावी लागेल.
व्यक्तिमत्वांची खरी ओळख बर्‍याचदा फसवी असते, हेच जणु, प्रकाश व प्रदीप ह्यांनी जाणवून दिले आहे. प्रकाश चिटगोपेकर दिसायला जितका मनमुराद, उन्मुक्त वाटायचा, तितकाच तीव्र चिकाटीचा निघाला. सलमान खानचा जो डायलॉग आजकाल प्रसिद्ध आहे ( जब मै एकबार कमिट करता हूं तो फिर मै खुदकी भी नही सुनता ), त्याची आठवण करून देणारी त्याची ही चिकाटी होती. सत्तेच्या राजकारणाला कोणीही चिकटून राहू शकतो. कारण त्यात फायदेच असतात. पण कायम विरोधकांबरोबर राहणे, त्या कमिटमेंटचे सर्व धोके सहन करणे ह्याला पराकाष्ठेची चिकाटी लागते. प्रकाशने ते धारिष्ट्य शेवटपर्यंत प्राणपणाने जपले होते. प्रदीपही त्याच चिकाटीचा निघाला . ती जशी प्रकाशकडे होती तशीच चिकाटी प्रदीपनेही दाखवली, ती त्याच्या "जल-संवाद" ह्या मासिकावरून व ते नेटाने चालवण्यावरून.
आपण पाण्याचे महत्व नुसते निबंधापुरते वाखाणतो. त्याला जीवन म्हणतो. पण पाणी व तत्सम प्रश्नांकडे कायमच दुय्यम महत्व देतो. पण त्यालाच शिरोधार्य ठरवीत, त्यावर, केवळ पाणी-प्रश्नावर, एक मासिक चालवणे हे फारच जगावेगळे धाडस होते. बरे त्याच्या सौम्य व्यक्तिमत्वाच्या अगदी विरोधी गुणांचे हे काम होते. तरीही त्याने ते चिकाटीने रेटले आणि हेच फार कौतुकास्पद आहे.
माझे वडील वारले तेव्हा त्यांच्या स्मरणार्थ शिऊरच्या मंदीराला काही देणगी द्यावी, असे मी मनात योजत होतो. अनायासे शिऊरहून काही वारकरीही आलेले होते. मी त्यांना तसे बोलून दाखवले. त्यावर त्या खेडवळ माणसाने जे सांगितले तो माझ्या समजूतीने "श्रद्धांजली कशी अर्पण करावी" ह्याचा श्रेष्ठ पाठच होतो. त्याने विचारले होते की तुम्हाला असे का वाटते ? त्यावर मी स्पष्ट केले की माझ्या वडिलांची वारकरी संप्रदायाप्रती अपार श्रद्धा होती व त्या मार्गावर त्यांचा लोभ होता, असे मला त्यांचे काही लिखाण वाचून वाटते. ह्यावर तो खेडुत म्हणाला होता, मग तुम्हाला त्यांच्याबद्दल तसे काही करावे असे वाटतेय तर तुम्ही वारकर्‍यांबद्दल, त्यांच्या भक्तिमार्गाबद्दल जातीने काही वाचा, अनुभवा. तीच मोठी श्रद्धांजली होईल. त्यानंतरच मी तुकाराम, ज्ञानेश्वर वगैरे संतसाहित्याचा अभ्यास करण्याचे ठरविले व अजून ते चालू आहे.
ह्याच दृष्टीने प्रदीपला खरी श्रद्धांजली द्यायची, तर पाण्यासंबंधी काही लिहावे असे ठरवून सध्या जगात पाण्यावर जे संशोधन चालू आहे त्याचा मागोवा घेणारा एक लेख मी तयार करीत आहे. त्यातली एकच गोष्ट इथे नमूद करतो. आपल्याकडे बच्चाबच्चा जाणतो की पाण्याची रासायनिक संज्ञा "एच-टू-ओ" ( H2 O ) अशी आहे. पैकीच्या पैकी मार्कांसाठी, आपण घोकतो की हायड्रोजनचे दोन अणू व ऑक्सिजनचा एक अणू, अशा संयोगाने पाणी तयार होते. हेच आपण कितीही ज्यास्त शिकलो तरी मानत जातो. पण संशोधक म्हणतात, ह्यातले हायड्रोजनचे दोन अणु हे पक्के दोन नसून थोडे कमी आहेत. जसे: १.९ . आहे की नाही आपल्या समजूतीला धक्का देणारे. अशाच काही गोष्टी ह्या निमित्त मी गोळा केल्या आहेत.
हा लेखच माझी प्रदीप चिटगोपीकरच्या जल-निर्वाणाला खरी श्रद्धांजली आहे ! त्याच्या कुटुंबियांना त्याच्याशिवाय जगताना बळ मिळो हीच प्रार्थना !

----अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com